राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी दहाव्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघाने पेनल्टी शूट आऊटमध्ये न्यूझीलंडचा २-१ अशा फरकाने पराभव करत कांस्यपदक पटकाविले. तब्बल १६ वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळविले.
निर्धारित ६० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केली. सलीमा टेटेने भारतासाठी पहिला गोल केला. न्यूझीलंडच्या ऑलिव्हिया मेरीने शेवटच्या क्षणी गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. यावेळी भारतीय संघाने कोणतीही चूक केली नाही. पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलकिपर सविता पुनियाने चपळाईने न्यूझीलंडचे चार प्रयत्न निष्फळ ठरविले. त्यामुळे भारताला पदक जिंकता आले.
भारतीय महिला हॉकी संघाने याआधी २००२मध्ये सुवर्ण आणि २००६मध्ये रौप्यपदक मिळविले होते.
गट सामन्यांमध्ये भारताने घाना (५-०), वेल्स (३-१) आणि कॅनडा (३-२) यांना पराभूत करून उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वादग्रस्त पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय महिलांना न्यूझीलंडविरुद्ध कांस्य- पदकासाठीची लढत खेळावी लागली. उपांत्य फेरीत भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ३-० असा पराभव झाला होता.