भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. उपांत्य फेरीत भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागेल.
जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ही दुसरी भारतीय जोडी ठरली. यापूर्वी अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गुट्टा यांनी २०११मध्ये या स्पर्धेत पदक जिंकले होते. उपांत्य फेरीत मलेशियाच्या ऑरोन चिया आणि सोह वूई यिक जोडीने सात्विक-चिराग जोडीचा २०-२२, २१-१८, २१-१६ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय जोडीने शानदार कामगिरी करत पहिला गेम २२-२० अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र भारतीय जोडीचा १८-२१ असा पराभव झाला. भारतीय जोडीने शेवटचा आणि निर्णायक गेमही १६-२१ असा गमावला. उपांत्य फेरीतील या पराभवामुळे भारताच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा मावळल्या.