IPL 2025 : ‘त्या’ चौकडीमुळे मुंबईला रोखणे कठीण; जाणकारांचे मत
मुंबई : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमरा ही चौकडी मुंबईची ताकद आहे. या चौघांना रोखणे आता अन्य संघांना कठीण जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये झोकात पुनरागमन करत आहे, असे मत माजी क्रिकेटपटूंनी नोंदवले.
पहिल्या पाचपैकी फक्त एक लढत जिंकणाऱ्या मुंबईने गेल्या चारही सामन्यांत विजय मिळवला. त्यामुळे ९ सामन्यांतील ५ विजयांसह मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीत टिकून आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबईने यापूर्वीही अनेकदा पिछाडीवरून सरशी साधली आहे. माजी क्रिकेटपटू संजय बांगर, नवजोत सिंग सिद्धू, हरभजन सिंग यांनी या मुद्द्यांवर लक्ष वेधले.
रोहितने चेन्नई व हैदराबादविरुद्ध सलग दोन अर्धशतके साकारली. तसेच सूर्यकुमार सातत्याने अप्रतिम फलंदाजी करत आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्टला गवसलेला सूर मुंबईसाठी आणखी हिताची बाब ठरत आहे. दीपक चहर व बोल्ट यांची जोडी पॉवरप्लेमध्ये घातक ठरत आहे. बुमरा नेहमीच मुंबईसाठी तारणहार ठरला आहे. हैदराबादविरुद्ध त्याची गोलंदाजी काहीशी फिकी वाटली. मात्र चिंता करण्याचे कारण नाही. असेही जाणकारांचे मत आहे.
मुंबईचा संघ उर्वरित ५ पैकी ३ सामने वानखेडेवर खेळणार आहे. तर दोन लढती त्यांच्या अनुक्रमे जयपूर व धरमशाला येथे होतील.