ताऱ्यांनी सजलेल्या मुंबईच्या पदरी पुन्हा निराशा!
अहमदाबाद : तारांकित खेळाडूंनी सजलेल्या मुंबई इंडियन्सचे सहाव्या आयपीएल जेतेपदाचे स्वप्न रविवारी मध्यरात्री धुळीस मिळाले. आयपीएलच्या १८व्या हंगामातील क्वालिफायर-२ सामन्यात पंजाबने मुंबईला ५ गडी राखून धूळ चारली. त्यामुळे तमाम मुंबईच्या चाहत्यांची निराशा झाली असून मुंबईच्या या अपयशामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याची विचारणा केली जात आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईच्या संघात भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, विश्वातील सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमरा असे भारतीय खेळाडू आहेत. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, फिरकीपटू मिचेल सँटनर, युवा तिलक वर्मा असेही प्रतिभावान खेळाडू त्यांच्याकडे आहेत. मात्र मुंबईला अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली नाही.
मुख्य म्हणजे एकवेळ सुरुवातीच्या पाचपैकी चार सामने गमावल्यावर मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी होता. त्यावेळी मुंबई बाद फेरीसाठीही पात्र होईल की नाही, याविषयी साशंका होती. मात्र त्यानंतर सलग सहा सामने जिंकून मुंबईने पुनरागमन केले. मुंबईकडे अव्वल दोन संघांत स्थान मिळवण्याची संधी होती. मात्र दडपणाखाली ते पंजाबविरुद्ध ढेपाळले. गुजरातविरुद्ध मग एलिमिनेटरमध्येही मुंबई जवळपास पराभवाच्या छायेत होती. मात्र बुमराच्या गोलंदाजीने सामन्याचे रूप पालटले.
अखेर क्वालिफायर-२मध्ये बुमरा अपयशी ठरला व परिणामी मुंबईचीही वाटचाल संपुष्टात आली. तसेच फलंदाजीत मुंबईने २० ते २५ धावा कमी केल्या. पहिल्या चार फलंदाजांनतर मुंबईची फलंदाजी संपली, असेच संपूर्ण हंगामात वाटले. कारण नमन धीर व हार्दिक हे अखेरच्या पाच षटकांसाठी उपयुक्त फलंदाज आहेत. रोहितची कामगिरी संमिश्र स्वरुपाची ठरली. तर सूर्यकुमारने सातत्याने छाप पाडली. मात्र निर्णायक क्षणी त्यांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. तसेच हार्दिकच्या नेतृत्वातील उणिवाही दिसून आल्या.
काही वेळेस खेळाडूंना झालेल्या दुखापती मुंबईला महागात पडल्या. तसेच रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवलेले आहे. मात्र त्याच्यासारख्या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरणे, मुंबईसाठी घातक ठरले, असेही काहींचे म्हणणे आहे. २०२४मध्ये मुंबईला हार्दिकच्या नेतृत्वातच १०व्या स्थानी समाधान मानावे लागले. मात्र यंदा त्यांनी किमान बाद फेरी गाठली. आता पुढील वर्षी मुंबई या बाबींवर कार्य करून विजेतेपद पटकावेल, अशी तमाम चाहत्यांना आशा आहे.