
नवी दिल्ली : गेल्या नऊ महिन्यांत भारतीय संघाने बरेच चढउतार पाहिले. संघातील खेळाडूंनी एकजुटीने खेळत यश मिळवले. तीन आयसीसी स्पर्धा अपराजित राहणे हे आश्चर्यकारक आहे. या यशामागे संघातील प्रत्येक खेळाडूचा हात आहे, असे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. मुंबई इंडियन्सच्या एक्स पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित बोलत होता.
शेवटच्या ३ आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये भारताने २४ पैकी केवळ एकच सामना गमावला आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले. भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी२० विश्वचषक जिंकले. त्याच दरम्यान भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
रोहित शर्मा म्हणाला की, मोठ्या तीन स्पर्धांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. परंतु एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात भारताला यश आले असते तर ते विलक्षण होते. २४ सामन्यांपैकी २३ विजय मिळवणे ही मोठी गोष्ट आहे, असे रोहित म्हणाला.