
टोकियो : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूला बुधवारी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मात्र लक्ष्य सेन, सात्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी विजयी सलामी नोंदवली.
७५० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत कोरियाच्या सिम यू जिनने माजी जगज्जेत्या सिंधूला २१--१५, २१-१४ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. ३० वर्षीय सिंधूला २०२४पासून एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. मुख्य म्हणजे २०२५ या वर्षात सिंधू पाचपैकी चार स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे.
पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानी असलेल्या सात्विक-चिराग यांनी कोरियाच्याच कँग मिन आणि किम डाँग यांना २१-१८, २१-१० असे नेस्तनाबूत केले. तसेच पुरुष एकेरीत लक्ष्यने चीनच्या झेंग झिंगवर २१-११, २१-१८ अशी मात केली.
महिला एकेरीत भारताची अन्य स्पर्धक अनुपमा उपाध्यायने दमदार प्रारंभ करताना भारताच्याच रक्षिताला २१-१५, १८-२१, २१-१८ असे तीन गेममध्ये नमवले. उन्नती हूडाचे आव्हान मात्र सिंधूप्रमाणेच सलामीला संपुष्टात आले.
२०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये एकही पदक जिंकता आले नाही. तेव्हापासून भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी फारच निराशाजनक सुरू आहे. २०२५मध्ये आयुष शेट्टीच्या रूपात भारताने बॅडमिंटनमध्ये एकमेव स्पर्धा जिंकलेली आहे. मात्र प्रणॉय, श्रीकांत, सिंधू, लक्ष्य या प्रमुख खेळाडूंचे एकेरीतील अपयश भारताला महागात पडत आहे. दुहेरीत सात्विक-चिराग किमान उपांत्यपूर्व ते उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत आहेत. मात्र त्यांनाही अद्याप या हंगामात एखादी स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय बॅडमिंटनपटूंना कामगिरी उंचावण्याची गरज आहे.