कल्याण टस्कर्सची उपांत्य फेरीकडे कूच

कोपरखैरणे टायटन्सने दिलेले १२३ धावांचे लक्ष्य १२५ धावांसह पूर्ण करत कल्याण टस्कर्सने स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
कल्याण टस्कर्सची उपांत्य फेरीकडे कूच

ठाणे : कल्याण टस्कर्स संघाने कोपरखैरणे टायटन्सचा सात विकेट्सनी पराभव करत माझगाव क्रिकेट क्लबने रोझ मर्कच्या सहकार्याने आयोजित केलेल्या दुसऱ्या नवी मुंबई प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. कोपरखैरणे टायटन्सने दिलेले १२३ धावांचे लक्ष्य १२५ धावांसह पूर्ण करत कल्याण टस्कर्सने स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

सागर जाधव आणि तनिश शेट्टीच्या फलंदाजीमुळे कोपरखैरणे टायटन्स संघाला २० षटकांत ९ बाद १२३ धावापर्यंत मजल मारता आली. सागरने ३३ आणि तनिशने २८ धावांचे योगदान दिले. श्रेयस गुरवने १७ आणि विकी पाटीलने १६ धावा केल्या. पार्थ चंदनने तीन आणि धवल पटेलने दोन विकेट्स मिळवल्या.

संदीप सरोज, अमन खान आणि दशरथ चव्हाणने फलंदाजीत मोलाचे योगदान देत कल्याण टस्कर्स संघाला १४.४ षटकात तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १२५ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. संदीपने ३५, अमनने ३३ आणि दशरथने २७ धावा केल्या. पराभूत संघाच्या श्रेयस गुरव, ऋषिकेश गोरे आणि सर्फराज शेखने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

logo
marathi.freepressjournal.in