

मुल्लानपूर : के. एल. राहुलचा संयम आणि कर्णधार शुभमन गिलच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ३ विकेट्स गमावून ३६८ धावांचा डोंगर उभारला आहे.
पहिल्या दिवशी भारताच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. राहुलने १६५ चेंडूंत ११ चौकारांसह १०० धावा केल्या, तर कर्णधार शुभमन गिल १४३ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकारांसह १०३ धावांवर नाबाद खेळत आहे. शुभमन गिलचे हे ४१व्या कसोटीतील ११ वे शतक ठरले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या तासात यशस्वी जैस्वाल अवघ्या २४ धावांवर लेग-साइडला फटका मारण्याच्या नादात बाद झाला.
यानंतर राहुल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. सुदर्शनला या डावात दोन जीवदाने मिळाली, मात्र तो ८१ धावांवर बाद झाला. मोहम्मद सलीमच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टीरक्षक अफसर जझाईकडे कॅच देऊन बाद झाला. राहुलने १६४ चेंडूंत आपले १२वे कसोटी शतक पूर्ण केले, परंतु शतकानंतरच्या पुढच्याच चेंडूवर तो झियाउर रहमानच्या गोलंदाजीवर कव्हर फील्डरला कॅच देऊन बाद झाला.
शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी १२१ धावांची नाबाद भागीदारी करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. पंत ७० चेंडूंत ३ षटकारांसह ५० धावांवर नाबाद आहे. अफगाणिस्तानसाठी मोहम्मद सलीमने ६७ धावांत २ तर झियाउर रहमानने ६१ धावांत १ विकेट घेतली. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी एकूण ४२ चौकार आणि ४ षटकार ठोकले.