इंग्लंडविरुद्ध १ ते ५ जुलै दरम्यान बर्मिंगहॅममध्ये होणारा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना जिंकून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. इंग्लंडकडून या कसोटीत पराभव झाल्यास टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेत आपल्या तिसऱ्या स्थानवरून खाली येऊ शकतो. दरम्यान, भारताला मालिका जिंकून इतिहास रचण्याची नामी संधी आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माला त्याच्या पहिल्या कसोटीत सामनात कठीण आव्हान मिळणार आहे.
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमधील भारताचे स्थान श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या निकालावरदेखील अवलंबून आहे. भारत सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताची विजयाची टक्केवारी ५८.३३ टक्के इतकी आहे. श्रीलंका त्याचवेळी ५५.६६ टक्के आणि ४० गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
घरच्या मैदानावर श्रीलंकेचा विजय झाल्यास आणि भारताचा पराभव झाल्यास टक्केवारीच्या गुणांवर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळविल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंका सामन्याचा निकाल कोणताही लागला तरी भारत तिसऱ्या स्थानावर राहील. श्रीलंका हरल्यास ऑस्ट्रेलियाचे स्थान मजबूत होऊ शकेल.