
नवी दिल्ली : पुरुष दुहेरीतील तारांकित भारतीय जोडी सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शुक्रवारी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.
१,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सात्विक-चिरागने यू सिन मिंग आणि ये टी टियो या मलेशियन जोडीवर २६-२४, २१-१५ असे सरळ दोन गेममध्ये वर्चस्व गाजवले. पहिला गेम २६ गुणांपर्यंत लांबला असला तरी सात्विक-चिरागने ही लढत ४९ मिनिटांत जिंकली. आता शनिवारी त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाच्या वोन हो किम आणि जी सियो या जोडीचे आव्हान असेल. गतवर्षी सात्विक-चिरागला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदा ते कसर भरून काढतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, पुरुष एकेरीत चीनच्या ली शी फेंगने भारताच्या एच. एस. प्रणॉयला २१-८, १५-२१, २३-२१ असे तीन गेममध्ये नमवले. महिलांमध्ये मालविका बनसोड चीनच्या हॅन यूकडून १८-२१, ११-२१ अशी पराभूत झाली. अनुभवी पी. व्ही. सिंधूने या स्पर्धेतून माघार घेतली होती. महिला दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री गोपिचंद, तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या जोड्या पराभूत झाल्या. लक्ष्य सेनचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. त्यामुळे आता पुढील आठवड्यात रंगणाऱ्या इंडिया ओपन स्पर्धेत या खेळाडूंकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटूंनी निराशा केली होती.