
मुंबई : जम्मू-काश्मीरविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर मुंबईने शनिवारी मेघालयवर दणदणीत विजय मिळवला. शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन यांच्या भेदक गोलंदाजीच्या (प्रत्येकी ४ विकेट) बळावर मुंबईने मेघालयविरुद्ध डाव आणि ४५६ धावांनी सरशी साधली. या कामगिरीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘ए’ गटात मुंबईने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. गत विजेता मुंबई आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही संघांच्या खात्यात समसमान २९ गुण आहेत. मात्र मुंबईचा रन रेट १.७४ आणि जम्मू-काश्मीरचा रनरेट १.५९ इतका आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचा सामना बडोद्याविरुद्ध सुरू आहे. या सामन्यात तो संघ किमान तीन गुण मिळवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जम्मू-काश्मीरचा संघ गटातील टॉपर म्हणून लीग फेरी संपवू शकतो.
पहिल्या डावात ५८५ धावांनी पिछाडीवर पडलेल्या मेघायलाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही निराश केले. दुसऱ्या डावात पाहुणा संघ अवघ्या १२९ धावांवर आटोपला. शार्दूल ठाकूरने ४८ धावा देत ४ फलंदाज बाद केले. तर कोटियनने १५ धावा देत ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
मेघालयचा पहिला डावही स्वस्तात आटोपला होता. पहिल्या डावात त्यांना अवघ्या ८६ धावा जमवता आल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मुंबईच्या संघाने ७ फलंदाज गमावून ६७१ धावांवर आपला डाव घोषित केला होता. त्यामुळे मुंबईच्या संघाने विजयासह बोनस गुण मिळवले.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मुंबईने डावासह सर्वाधिक धावांनी मिळवलेला हा विजय आहे. या मोठ्या विजयामुळे उपांत्य फेरीतील मुंबईच्या प्रवेशाची शक्यता अधिक आहे. ८ फेब्रुवारीपासून उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होणार आहे.
शनिवारी २९ धावांवर २ फलंदाज बाद येथून खेळताना तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये मुंबईने उर्वरित ८ विकेट घेतले. किशन लिंडोह (३९ धावा) आणि अनिरुद्ध बी (२४ धावा) यांनी मेघालयतर्फे झुंजार खेळी खेळली. मात्र संघाचा पराभव वाचवण्यात ती पुरेशी नव्हती.
संक्षिप्त धावफलक : मेघालय ८६ आणि १२९ धावा (किशन लिंडोह ३९, अनिरुद्ध बी २४; शार्दुल ठाकूर ४/४८, तनूष कोटियन ४/१५) विरुद्ध मुंबई ६७१/७ घोषित. मुंबईने डाव आणि ४५६ धावांनी विजय मिळवला.
गुजरात उपांत्यपूर्व फेरीत
आर्या देसाई आणि जयमीत पटेलच्या दमदार अर्धशतकांसह फिरकीपटू सिद्धार्थ देसाईच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने रणजी ट्रॉफीच्या ब गटातील शेवटच्या सामन्यात हिमाचल प्रदेशवर नऊ विकेटने दणदणीत विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. देसाईने चार विकेट घेतल्या, तर विशाल जैस्वालने तीन आणि जयमीतने दोन बळी घेतले. त्यामुळे गुजरातने हिमाचल प्रदेशला ६२.५ षटकांत १७५ धावांत गारद केले. हिमाचलने तिसऱ्या दिवशी ६३ धावांवर दोन बाद अशी सुरुवात केली होती.
साहाला विजयी निरोप
यष्टीक्षक फलंदाज वृद्धीमान साहाने शनिवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती स्वीकारली. रणजी ट्रॉफी सामन्यात पंजाबवर विजय मिळवल्यानंतर बंगालच्या खेळाडूंनी त्याला उचलून घेतले.