ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता!

महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेची मागणी
ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता!

नवी दिल्ली : आशियाई सुवर्णपदक विजेता महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेने आधुनिक काळात क्रीडापटूसाठी मानसोपचारतज्ज्ञ किती आवश्यक आहे, हे अधोरेखित करतानाच ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी त्यालाही मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे, असे स्पष्ट केले.

बीडच्या २९ वर्षीय अविनाशने नुकताच झालेल्या आशियाई स्पर्धेत ३,००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुवर्ण, तर ५,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक काबिज केले. अविनाश २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याला ऑगस्ट महिन्यात जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरीही गाठता आली नव्हती. मात्र पुढील वर्षी ऑलिम्पिकमध्ये त्याच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.

“तंदुरुस्तीकडे लक्ष देऊनही मला जागतिक स्पर्धेत अपयश आले. त्यावेळी मला मानसिक स्थिरता किती महत्त्वाची आहे, हे समजले. अनेकांनी मला योगासन व चिंतन करण्यास सांगितले. आशियाई स्पर्धेसाठी तयारी करताना मी यूट्यूबद्वारे योगासन तसेच मानसिक शांतता कशी राखावी, याचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळेच आशियाई स्पर्धेत माझी कामगिरी उंचावली,” असे अविनाश म्हणाला. त्याशिवाय अविनाशने मार्च महिन्यापर्यंत मोरोक्को येथे सराव करण्याची इच्छाही प्रकट केली असून आपल्यासाठी क्रीडा मंत्रालयाने लवकरच अनुभवी मानसोपचारतज्ज्ञाची नेमणूक करावी, अशी मागणीही केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in