.avif?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.avif?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटातून अपात्र ठरवण्यात आल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. मात्र विनेशचे अपील फेटाळून लावण्यात आल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बुधवारी दिली. त्यामुळे विनेशला पदकाविनाच रहावे लागणार, हे स्पष्ट झाले आहे.
विनेशने महिलांच्या ५० किलो वजनी गटात तीन लढती जिंकून अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे तिचे किमान रौप्यपदक निश्चित झाले होते. मात्र अंतिम फेरीआधी बुधवारी सकाळी वजन तपासणीसाठी गेली असता, तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला संपूर्ण स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर करण्यासह त्याच दिवशी तिने क्रीडा लवादाकडे अपील केले होते. क्रीडा लवादाने २४ तासांच्या आत निर्णय देणे अपेक्षित असताना, निकाल जाहीर करण्यास तीन वेळा मुदत मागितली आहे. विनेशबाबतचा निर्णय मंगळवारी जाहीर होण्याची अपेक्षा असताना, क्रीडा लवादाने पुन्हा एकदा निराशा करताना १६ ऑगस्ट ही तारीख दिली होती. मात्र आयओएने बुधवारीच विनेशचे अपील फेटाळून लावण्यात आल्याचे जाहीर केले.
क्रीडा लवादाकडे विनेश फोगटची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या दोघांची निवड भारताने केली होती.
"आम्ही याचिका दाखल केल्यानंतर विनेशची बाजू मांडण्यासाठी खूप मेहनत घेतली. विनेशला रौप्यपदक मिळेल, अशी आशा आम्हाला आहे. विनेशच्या प्रकरणावर निकाल देण्यासाठी क्रीडा लवादापुढे २४ तासांचा अवधी होता. पण क्रीडा लवादाने २४ तासांत निर्णय दिला नाही. त्यानंतर त्यांनी निर्णय देण्याचा अवधी वाढवला आहे. या गोष्टीचा असा अर्थ निघतो की, क्रीडा लवादाने ही गोष्ट गंभीरपणे घेतली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रीडा लवाद एवढ्या वेळा विचार करत आहे, म्हणजेच निर्णय आपल्या बाजूने असेल, अशी मला आशा आहे," असे सिंघानिया म्हणाले होते. मात्र त्यांच्याही पदरी निराशा पडली.
२९ वर्षीय विनेशच्या कारकीर्दीतील ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती. यापूर्वी २०१६मध्येही तिला याच कारणामुळे उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. विनेश प्रकरण संपल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पदकसंख्या सहाच राहणार, हे पक्के झाले.