वन-डे आणि कसोटी क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात; भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांचे रोखठोक मत

भारताच्या ७६व्या स्वातंत्र्यदिनामित्त सिडनी येथे भारत-ऑस्ट्रेलिया ‘स्ट्रॅटेजिक अलायन्स डिनर’ आयोजित करण्यात आले होते
वन-डे आणि कसोटी क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात; भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांचे रोखठोक मत

टी-२० लीग क्रिकेटच्या उदय आणि विकास यामुळे वन-डे आणि कसोटी क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे रोखठोक मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले.

भारताच्या ७६व्या स्वातंत्र्यदिनामित्त सिडनी येथे भारत-ऑस्ट्रेलिया ‘स्ट्रॅटेजिक अलायन्स डिनर’ आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कपिलदेव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी क्रिकेटची सद्य:स्थिती आणि भविष्याबाबत आपले मत मांडले. ते म्हणाले की, क्रिकेटच्या स्वरूपामध्ये कालानुरूप अनेक बदल झाले. या बदलांमुळे क्रिकेटच्या मूळ स्वरूपांना धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, कपिलदेव यांनी ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ आणि ‘द एज’ला सांगितले की, “वन-डे आणि कसोटी क्रिकेट हळूहळू लुप्त होत आहे. सध्या क्रिकेटची स्थिती युरोपातील फुटबॉल लीगप्रमाणे झाली आहे. तिथे फुटबॉलच्या द्विराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत. चार वर्षांतून एकदाच विश्वचषक होतो. आयसीसीने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर भविष्यात क्रिकेटही अशाच प्रकारे खेळले जाईल. वन-डे क्रिकेट फक्त विश्वचषकापुरते मर्यादित राहील आणि इतरवेळी फक्त टी-२० लीग क्रिकेट खेळले जाईल.”

क्रिकेटपटू केवळ आयपीएल किंवा बिग बॅशसारख्या लीग खेळणार आहेत का? असा सवाल कपिलदेव यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, “अनेक क्रिकेटपटू फार लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आयसीसीला एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटचे अस्तित्व सुरक्षित करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत”.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in