
मुंबई : २५ वर्षीय प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ आता हंगामी देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईऐवजी महाराष्ट्राकडून खेळताना दिसणार आहे.
२०१८मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघाला आयसीसी विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचे नेतृत्व पृथ्वीने केले होते. शुभमन गिल त्या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. मात्र गेल्या ७ वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पृथ्वी भारतीय संघातील स्थानापासून फार दूर आहे, तर गिल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. पृथ्वीने मुंबईच्या रणजी संघातीलही स्थान गमावले आहे. वाढलेले वजन आणि गैरवर्तनामुळे तो अनेकांच्या नापसंतीस उतरला आहे. त्यामुळेच पृथ्वीने आता मुंबईऐवजी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पृथ्वीला महाराष्ट्राची जर्सी देत त्याचे संघात स्वागत केले. पृथ्वी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळताना दिसेल. त्यामुळे पृथ्वी या हंगामात कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.