रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: यशमुळे विदर्भाला पहिल्या डावात आघाडी

या लढतीच्या पहिल्या डावात विदर्भाने ४२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रविवारी, विदर्भाने हरयाणाला ३३३ धावांत गुंडाळले.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: यशमुळे विदर्भाला पहिल्या डावात आघाडी

नागपूर : मध्यमगती गोलंदाज यश ठाकूर (७९ धावांत ३ बळी) आणि डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटे (५९ धावांत ३ बळी) यांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात हरयाणाविरुद्ध पहिल्या डावात निर्णायक आघाडी मिळवली. सौराष्ट्राने अ-गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठली असल्याने विदर्भाला किमान अनिर्णित राखणे अनिवार्य आहे.

या लढतीच्या पहिल्या डावात विदर्भाने ४२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रविवारी, विदर्भाने हरयाणाला ३३३ धावांत गुंडाळले. निशांत सिंधूने १३१ धावांची खेळी साकारली. तसेच राहुल तेवतियाने ५९ धावा केल्या. मात्र तरीही विदर्भाने ९० धावांची आघाडी घेतली. मग दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाने ४ बाद ११३ धावा केल्या आहेत. कर्णधार अक्षय वाडकर ७ धावांवर नाबाद आहे. ध्रुव शोरे (४३) व अथर्व तायडे (४९) यांना अर्धशतकाने हुलकावणी दिली.

मुंबई उपांत्यपूर्व फेरीत; महाराष्ट्र गारद

मुंबईने ब-गटातून सात सामन्यांतील ५ विजय व १ बरोबरीच्या सर्वाधिक ३७ गुणांसह थाटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. मुंबईने शनिवारी आसामचा डावाने धुव्वा उडवून बोनस गुणही पटकावला. दुसरीकडे महाराष्ट्राला मात्र स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. त्यांचा अखेरचा सामना सेनादलविरुद्ध सुरू असला तरी या लढतीत विजय मिळवूनही ते अ-गटात सहाव्या स्थानी असल्याने आगेकूच करू शकणार नाहीत.

किशनवर कारवाईची शक्यता

झारखंडच्या इशान किशनला अखेरचा रणजी सामना खेळण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याने तसे न करता बीसीसीआयच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. आयपीएल खेळण्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना रणजी स्पर्धेची सक्ती केली आहे. मात्र किशन डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेतून पुनरागमन करणार असल्याचे समजते. तो सध्या बडोदा येथे सराव करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in