पंत कसोटी मालिकेसही मुकणार! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांसाठी लवकरच होणार भारतीय संघाची घोषणा

भारताचा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पायाच्या दुखापतीमुळे आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेस मुकणार आहे. त्यामुळे ध्रुव जुरेलला यष्टिरक्षक म्हणून पसंती देण्यात येणार असून नारायण जगदीशन पर्यायी यष्टिरक्षक असू शकतो.
पंत कसोटी मालिकेसही मुकणार! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांसाठी लवकरच होणार भारतीय संघाची घोषणा
Photo : ICC
Published on

मुंबई : भारताचा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पायाच्या दुखापतीमुळे आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेस मुकणार आहे. त्यामुळे ध्रुव जुरेलला यष्टिरक्षक म्हणून पसंती देण्यात येणार असून नारायण जगदीशन पर्यायी यष्टिरक्षक असू शकतो. लवकरच या मालिकेसाठी भारताची घोषणा करण्यात येईल.

२ ऑक्टोबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. अनुक्रमे अहमदाबाद व नवी दिल्ली येथे सामने होतील. २७ वर्षीय पंतला इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना उजव्या पायाला चेंडू लागल्याने दुखापत झाली. पंतच्या पायातून रक्त येत होते. तसेच पायाला सूजही आली होती. मात्र तरीही तो फलंदाजीस आला होता. पंतने अर्धशतक झळकावून सर्वांची मने जिंकली. तसेच स्वत:चे शौर्यही दाखवले. मग पाचव्या कसोटीला पंत मुकला. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला भारतीय संघात स्थान देण्यात आले.

ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीनंतर भारतीय संघाचा एकही सामना नाही. मात्र पंतला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी किमान सहा आठवड्यांचा अवधी लागू शकतो, असे त्यावेळीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे तो आशिया चषकाला मुकला. आता विंडीजविरुद्धच्या मालिकेसही तो अनुपलब्ध असेल, असे समजते.

९ ते २८ सप्टेंबर या काळात आशिया चषक रंगत आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत.

दरम्यान, भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. आयसीसीने २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले.

गिल आणि प्रशिक्षक गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने भारताला धूळ चारली. मग एजबॅस्टन येथे भारताने पलटवार करताना मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या कसोटीत भारताने साऊथहॅम्पटन येथे अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करला. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत मग भारताने दुसऱ्या डावात तब्बल पाच सत्र फलंदाजी करून लढत अनिर्णित राखली. २०२१-२२च्या मालिकेतसुद्धा भारताला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळी भारताने पिछाडीवरून मालिकेत बरोबरी साधली. भारताने २००७मध्ये यापूर्वी इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती.

दरम्यान, आता सर्वांचे लक्ष विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडीकडे आहे.

बुमराला पुन्हा विश्रांती?

तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती द्यायची की नाही, असा पेच संघ व्यवस्थापनासमोर आहे. बुमराला गेल्या काही वर्षांपासून पाठदुखीने सातत्याने छेडले आहे. तसेच गोलंदाजीच्या शैलीमुळे त्याच्या पाठीवर अतिरिक्त ताण येतो. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो पाचपैकी तीनच कसोटी खेळला. आशिया चषकात बुमरा सध्या खेळत असून २ तारखेपासून लगेगचच वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका सुरू होईल, अशा स्थितीत त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता अधिक आहे. बुमराने स्वत: मात्र आपण या मालिकेसाठी उपलब्ध आहोत, असे निवड समितीला कळवले आहे. प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज व आकाश दीप असे वेगवान गोलंदाजांचे पर्याय भारताकडे आहेत. तसेच रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर आता कुलदीप यादव, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांच्यावर कसोटीत भारताची फिरकीची भिस्त असेल.

logo
marathi.freepressjournal.in