

नवी दिल्ली : संजू सॅमसनसारख्या खेळाडूची जागा कोणीही घेऊ शकत नाही. विराट कोहली, रोहित शर्माप्रमाणेच त्याची उणीव भरून काढणे अशक्य आहे. मात्र संघात युवा खेळाडू छाप पाडण्यास सज्ज असून वर्तमानात राहणे गरजेचे आहे, असे मत राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागने व्यक्त केले. गुरुवारी पराग व प्रशिक्षक कुमार संगकाराच्या उपस्थितीत राजस्थान संघाच्या जर्सीचे अनावरण जयपूर येथे करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला.
आता सर्वांना आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. सॅमसन यंदा राजस्थानला सोडचिठ्ठी देत चेन्नई संघाकडे दाखल झाला आहे. त्यामुळे पराग राजस्थानचे नेतृत्व करणार असून त्यांची सलामीलाच चेन्नईशी गाठ पडणार आहे.