विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) महाराष्ट्र संघाकडून खेळताना विश्वविक्रम रचला. त्याने ६ चेंडूंमध्ये ७ षटकार मारता जागतिक कामगिरी केली. एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने १० चौकार आणि १६ षटकारासह नाबाद २२० धावांची खेळी केली. प्रत्येक चेंडूवर षटकार मारत एका षटकात ७ षटकार मारणारा, तसेच ४३ धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला.
ऋतुराज यावेळी भावना व्यक्त करताना म्हणाला की, "षटकातील पाचवा षटकार मारल्यानंतर फक्त युवराज सिंगच नाव माझ्या मनात आले. विश्वचषकादरम्यान मी लहान असताना त्याला एका षटकात सहा षटकार मारताना पाहिले होते. मला त्याच्याच सारखा विक्रम करायचा होता म्हणून पाचवा षटकार बसल्यावर ही सहावा चेंडूही उंच भिरकवण्याचं ठरवलं. सहा षटकार पूर्ण होताच मला खूप आनंद झाला. मी एका षटकात सहा षटकार मारेन, असेही मला कधीच वाटले नव्हते."