मुंबई : आशिया कप स्पर्धेपूर्वी टी-२० संघाचा उपकर्णधार शुभमन गिलचे पुनरागमन भारतीय संघासाठी फायदेशीर असल्याचे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने मंगळवारी व्यक्त केले. २५ वर्षीय खेळाडू आक्रमक फलंदाजीने स्वत:ला सिद्ध करेल, असे पठाणला वाटते.
कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत यशस्वी झाल्यानंतर गिल हा टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. गिलमुळे संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादववरील दबाव काहीसा कमी होईल, असे पठाण म्हणाला.
सूर्यकुमार यादवच्या संमतीशिवाय गिलला उपकर्णधार म्हणून नेमले नसणार, असे पठाण एका क्रीडा वाहिनीच्या चर्चेदरम्यान म्हणाला.
सूर्यकुमार यादवची जबाबदारी ही फक्त प्रभावी फलंदाजीपुरती मर्यादित नाही, तर त्याला संघातील समन्वय साधून नेतृत्व करायचे आहे. त्यामुळे लोकांना वाटत असेल की त्याच्यावर दबाव येत आहे. पण तसे नाही. उलट हा निर्णय भारतीय क्रिकेटसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे पठाणला वाटते.
आयपीएलच्या मागील काही हंगामांतील गिलची कामगिरी पाहता गिलच्या पुनरागमनाने भारतीय संघाची फलंदाजी अधिक आक्रमक झाली आहे. गिललाही संघाच्या गरजेनुसार खळणे कठीण जाणार नाही, असे पठाण म्हणाला.
इंग्लंड दौऱ्यात गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. ५ सामन्यांच्या या मालिकेत गिलने फलंदाज आणि कर्णधार अशा दोन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली.