
बर्मिंगहॅम : एजबॅस्टन येथील कसोटी ही माझ्या कारकीर्दीतील तिसरी संस्मरणीय कसोटी आहे, अशी भावना मोहम्मद सिराजने व्यक्त केली.
“२०२१मध्ये गॅबा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला विजय माझ्यासाठी नेहमीच खास राहील. त्यानंतर २०२१मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध मिळवलेला विजय असेल. एजबॅस्टन येथील ही कसोटी माझ्या आयुष्यातील सर्वाधिक अविस्मरणीय विजयांत तिसऱ्या क्रमांकावर येईल. कसोटी क्रिकेटमधील कामगिरी तुम्हाला नेहमी दीर्घकाळासाठी स्मरणात राहते. त्यामुळे हा विजय आणि गेले पाच दिवस मला सुखावणारे ठरतील,” असे सिराज म्हणाला.
“आकाशने दुसऱ्या डावात ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ती कौतुकास्पद होती. मालिकेत पिछाडीवर असल्याने ही कसोटी जिंकणे फार मोलाचे होते. संपूर्ण सामन्यात आम्ही इंग्लंडला बॅकफुटवर ठेवले. त्याचेच फलित म्हणून आम्ही ही लढत जिंकू शकलो, असेही सिराजने नमूद केले.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. आता २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या हंगामात सिराजचे योगदान संघासाठी मोलाचे राहणार आहे. त्यामुळे सिराजवरील जबाबदारी वाढली आहे.