क्रीडामंत्रीच्या खेळीमुळे बंगालचा उपांत्य फेरीतील प्रवेश सुकर
श्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा मंत्रालय सांभाळणाऱ्या मनोज तिवारी यांनी रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात शतकी खेळी करून हा अनिर्णीत सामना गाजविला; परंतु तिवारी यांच्या खेळीमुळे बंगालचा उपांत्य फेरीतील प्रवेश सुकर झाला.
बंगळुरू येथे झारखंडविरुद्धच्या सामन्यात तिवारी यांनी १५२ चेंडूंत ही शतकी खेळी केली. त्यात त्यांनी १४ चौकार आणि एका षटकार लगावला. सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात बंगालची अवस्था चार बाद १२९ धावा अशी झालेली असताना तिवारी यांनी अभिषेक पोरेलसमवेत ७२ धावांची भागीदारी रचली. यानंतर अभिषेकला शाहबाज नदीमने ३४ धावांवर बाद केले. तिवारी यांनी १३६ धावा केल्या. ते धावबाद झाले. दुसऱ्या डावात बंगालने ७ बाद ३१८ धावा केल्या. त्यानंतर डाव घोषित केला. बंगालने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ७ बाद ७७३ धावा केल्या होत्या. सुदीप कुमार घारमी (३८० चेंडूंत १८६) आणि अनुस्तूप मुजूमदार (१९४ चेंडूंत ११७) यांनी शतकी खेळी केली होती. तिवारी यांच्यासह इतर सात फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली होती.
तिवारी (१७३ चेंडूंत ७३) यांच्यानंतर अभिषेक पोरेल (१११ चेंडूंत ६८), शाहबाज अहमद (१२४ चेंडूंत ७८), सयान मोंडल (८५ चेंडूंत नाबाद ५३) आणि आकाश दीप (१८ चेंडूंत नाबाद ५३) यांनीही अर्धशतकी खेळी केली. झारखंडकडून मिश्राने तीन विकटे घेतल्या. नदीमने दोन विकेट घेतल्या. त्याआधी सलामीवीर अभिषेक रामन (१०९ चेंडूंत ६१), कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (१२४ चेंडूंत ६५) यांनी अर्धशतके झळकविली होती.
झारखंडचा पहिला डाव २९८ धावात संपुष्टात आला होता. या डावात झारखंडकडून विराट सिंगने नाबाद ११३ धावांची खेळी केली. अखेर सामना अनिर्णीत राहिला.