
कोलंबो : डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने शानदार गोलंदाजी करत कसोटी क्रिकेटमध्ये १२ व्यांदा ५ विकेट्स मिळवण्याची कामगिरी केली. या बळावर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशला डाव आणि ७८ धावांनी पराभूत करत मालिका १-० ने खिशात घातली.
कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा संघ ११५ धावांवर ६ फलंदाज बाद अशा अडचणीत होता. त्यांचा संघ यजमानांपेक्षा ९७ धावांनी पिछाडीवर होता. जयसूर्याने शेवटच्या ४ पैकी ३ विकेट मिळवत श्रीलंकेच्या गळ्यात विजयी माळ घातली.
बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात केवळ १३३ धावांवर सर्वबाद झाला. त्याआधी पहिल्या डावात त्यांना २४७ धावा जमवता आल्या. सलामीवर पथुम निसांकाचे शतक, दिनेश चंडीमलच्या ९३ धावा आणि कुसल मेडीसच्या ८४ धावा या
बळावर श्रीलंकेने पहिल्या डावात ४५८ धावांचा डोंगर उभारला.
शनिवारी लिट्टन दास (१४) अवघी एक धाव जोडून जयसूर्याच्या सापळ्यात अडकला. जयसूर्याने या डावात ५६ धावा मोजत ५ विकेट मिळवल्या. कर्णधार धनंजया डी सिल्वा आणि रत्नायके यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.
जयसूर्याचे विकेटचे पंचक
डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले. त्यातून त्या संघाला सावरता आले नाही. जयसूर्याने या सामन्यात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये १२ व्यांदा ५ विकेट्स मिळवण्याची कामगिरी त्याने केली.