पुणे : सामनावीर वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेने दुसऱ्या डावात ५४ धावांत ५ बळी पटकावले. त्यामुळे विदर्भने अ-गटातील सामन्यात महाराष्ट्राला ३७१ धावांत गुंडाळले. त्यानंतर अथर्व तायडे (नाबाद ६) व ध्रुव शोरे (नाबाद २२) यांनी २८ धावांचे माफक लक्ष्य ६ षटकांतच गाठून महाराष्ट्राचा १० गडी राखून धुव्वा उडवला.
महाराष्ट्राला पहिल्या डावात २०८ धावांत गारद केल्यावर विदर्भने करुण नायरच्या शतकामुळे ५५२ धावांचा डोंगर उभारून ३४४ धावांची आघाडी मिळवली. ११व्या क्रमांकावरील आदित्यने नाबाद ३९ धावांचे योगदानही दिले होते. मग महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ३७१ पर्यंत मजल मारली. अंकित बावणे (८६) व दिग्विजय पाटील (६८) यांनी अर्धशतके झळकावली. परंतु ते विदर्भाला २८ धावांचेच लक्ष्य देऊ शकले. आदित्यने या स्पर्धेतील ६ सामन्यांत सर्वाधिक २९ बळी मिळवले आहेत. आता अखेरच्या लढतीत विदर्भासमोर हरयाणाचे, तर महाराष्ट्रासमोर सेनादलचे आव्हान असेल.