तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियममध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके झळकविली.
भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी सावध सुरुवात केली. पाच षट्कांमध्ये भारताच्या बिनबाद १७ धावा झाल्या होत्या, तर पहिल्या १० षट्कांमध्ये भारताच्या बिनबाद ४५ धावा झाल्या होत्या.
कर्णधार शिखर धवनने ६२ चेंडूमध्ये अर्धशतक झळकविले. शुभमन गिलने वन-डे कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक ६० चेंडूंमध्ये साजरे केले.
या जोडीची मोठ्या भागीदारीकडे वाटचाल सुरू असतानाच कर्णधार शिखर धवन २३ व्या षट्कातील पाचव्या चेंडूवर बाद झाला. त्याने ७४ चेंडूत ५८ धावा करताना सात चौकार लगावले. हेडन वॉल्शच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल पुरनने टिपला.