

मुंबई : भारताने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये एखाददुसऱ्या खेळाडूवर अवलंबून न राहता, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला. त्याचप्रमाणे आता अंतिम फेरीतही भारताने सांघिक कामगिरीवरच भर द्यावा, असा मोलाचा सल्ला भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला आहे.
गावस्कर यांच्या 'चॅम्प्स फाऊंडेशनसाठी' आयोजित एका सेलिब्रिटी गोल्फ स्पर्धेत लिटिल मास्टर सुनील गावस्कर म्हणाले की, "इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताने निसटता विजय मिळवला. माझ्या मते, अंतिम फेरीचा सामना थरारक होणार आहे. न्यूझीलंडने अभूतपूर्व क्रिकेटचे प्रदर्शन केले आहे. भारतीय संघानेही दोन ते तीन सामन्यांत अखेरच्या क्षणी दमदार खेळ करत विजय मिळवला आहे. भारतासाठी ही जमेची बाजू म्हणता येईल."
"भारताने संपूर्ण स्पर्धेत एकाच - खेळाडूवर अवलंबून न राहता, सांघिक कामगिरीनुसार यश संपादन केले आहे. गेल्या दोन-तीन सामन्यांत संजू सॅमसनला दिलेली संधी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे," असेही गावस्कर म्हणाले.