

दुबई : ओमान विरुद्ध शुक्रवारच्या लढतीत संघ सहकाऱ्यांना फलंदाजीला पुढे पाठवणे आणि स्वतः फलंदाजीला न येणे या कर्णधार सूर्यकुमार यादवच्या निर्णयाची दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी पाठराखण केली आहे.
यूएई आणि पाकिस्तानला धूळ चारून भारताने आधीच सुपर-४ फेरीत प्रवेश केला होता. ओमानविरुद्ध शुक्रवारी झालेल्या लढतीत संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीलाच आला नाही. संघाचे ८ विकेट पडूनही सूर्यकुमारने फलंदाजीला येणे टाळले. या सामन्यात भारताने निर्धारित २० षटकांत १८८ धावा जमवल्या आणि ओमानला २१ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताने आपल्या फलंदाजी क्रमात बदल केला होता. सूर्यकुमार यादव हा फलंदाजीला आलाच नाही.
या सामन्यातील सूर्यकुमारच्या फलंदाजीला न येण्याच्या निर्णयाबद्दल गावस्कर म्हणाले की, जर का सूर्यकुमार फलंदाजीला आला असता तर त्याने चौकार, षटकार असे फटके लगावले असते.
परंतु पाकिस्तानविरुद्ध त्याने केलेली फलंदाजी पाहता त्याला फलंदाजीच्या सरावाची आवश्यकता नसल्याचे गावस्कर म्हणाले. एका क्रीडा वाहिनीच्या कार्यक्रमात भारताचा माजी अष्टपैलू गोलंदाज इरफान पठाण सोबत चर्चासत्रात गावस्कर बोलत होते.