

मुल्लानपूर : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्यात येणार असल्याचे समजते. काही इंग्रजी संकेतस्थळांसह वृत्तवाहिन्यांनी याविषयी बातमी दिली असून मुंबईकर श्रेयस अय्यरकडे भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. २०२८च्या टी-२० विश्वचषकासह ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघबांधणी करण्यावर व्यवस्थापनाचा भर आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होण्यापूर्वीच बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलला या निर्णयाची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारला कर्णधारपदावरून हटवल्यास गेल्या १८ महिन्यांतील खराब कामगिरीमुळे त्याचे संघातील स्थानही धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच १५ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीला टी-२० संघात पदार्पण दिले जाण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमारला हटवल्यानंतर भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी श्रेयससह तिलक वर्माचे नावही आघाडीवर आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया हे राष्ट्रीय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या मुद्द्यावर एकाच मतावर आहेत की नाही, याबाबत अपेक्स कौन्सिलला माहिती देतील अशी अपेक्षा आहे.
निवड समितीला आयपीएल संपेपर्यंत सूर्यकुमार फॉर्ममध्ये परतण्याची वाट पाहायची होती. मात्र, तो केवळ धावाच करत नव्हता असे नाही, तर पूर्णपणे आऊट ऑफ फॉर्म दिसल्यामुळे हा कठीण निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवड समितीने त्याला मोठ्या यादीतून वगळण्याचे संकेत दिले असून, तो आता त्यांच्या योजनांचा भाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.
“कर्णधाराची निवड करणे सोपे नाही. सूर्यकुमारला वगळल्यानंतर आयपीएलमध्ये छाप पाडणारा तसेच मुश्ताक अली स्पर्धेतही मुंबईचे यशस्वी नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर हा एक स्पष्ट पर्याय दिसतो. परंतु, निवड समितीतील अनेकांना तिलक हा त्याच्या वयाचा विचार करता योग्य उमेदवार वाटत आहे,” असे सूत्रांनी सांगितले.