भारतीय संघाची एकदिवसीय सामन्यांत (IND vs NZ ODI) पराभवाची मालिका कायम आहे. शुक्रवारी ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागली आहे. तीन सामान्यांच्या मालिकेत आता न्यूझीलंडला १-० अशी आघाडी मिळाली आहे. एवढंच नव्हे तर २०१९च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा हा सलग पाचवा पराभव आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ विकेट्स गमावून ३०६ धावांचे लक्ष उभे केले. यामध्ये शिखर धवनने ७२, शुभमन गिलने ५० तर श्रेयस अय्यरने सर्वाधिक ८० धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठणे न्यूझीलंडला शक्य होईल का? असे वाटत असतानाच त्यांनी भारतीय गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि हे लक्ष सहजरित्या पार केले.
न्यूझीलंडने ७ विकेट्स राखून अवघ्या ४७.१ षटकांमध्ये हे लक्ष्य पार केले. यावेळी न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने १४५ धाव केल्या. तर कर्णधार केन विल्यमसनने ९४ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. एकदिवसीय पदार्पण करणाऱ्या उमरान मलिकने २ विकेट्स घेतले तर शार्दूल ठाकूरने १ विकेट घेतली. अर्शदीप सिंग, चहल आणि वॉशिंग्टन सुंदरला एकही विकेट मिळाली नाही.