प्रतिक्षा संपली! आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा ; 'या' खेळाडूंचा संघात समावेश

प्रतिक्षा संपली! आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा ; 'या' खेळाडूंचा संघात समावेश

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयच्या निवडकर्त्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे

क्रिकेट प्रेमींची गेल्या अनेक दिवसांसाठी असलेली प्रतिक्षा आता संपली असून आशिया कपसाठी भारतीय संघाच्या निवडीची घोषणा झाली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने ही घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आशिया कपसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत उतरणार असून हार्दिक पांड्यावर उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजू सॅमसनला बॅकअप म्हणून ठेवण्यात आलं आहे.

श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांना संघात स्थान देण्यात आलं असून हे दोन्ही खेळाडू दुखापतीतून सावरत आहेत. तिलक वर्मा हा पहिल्यांदाच एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. या संघात रोहित सोबत शुभमन गिल, विराट कोहली, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादव यांना स्थान मिळालं आहे. इशान किशन आणि के एल राहुल यांना यष्टीरक्षक म्हणून तर हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर,अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळालं आहे.

तर जसप्रीत बुमराह, मोहम्मह शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना वेगवान गोलंदाज म्हणून तर फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवचा आशिया कपसाठीच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in