वन-डे मालिकेतील इंग्लंडविरुद्धचा अखेरचा निर्णायक सामना

रवींद्र जडेजाऐवजी शार्दूल ठाकूरच्या समावेशाचे संकेत मिळत आहेत.
 वन-डे मालिकेतील इंग्लंडविरुद्धचा अखेरचा निर्णायक सामना
Published on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी मँचेस्टरमध्ये होणार आहे. मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने या निर्णायक सामन्यात कोण बाजी मारून मालिका जिंकतो, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताला फलंदाजीबाबतचा दृष्टिकोन बदलण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यातच भारतीय संघात दोन मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ स्वाभाविकपणेच प्रयत्नांची पराकाष्टा करणार असल्याने लढत रंगदार होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रसिद्ध कृष्णाच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला किंवा मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे, तर रवींद्र जडेजाऐवजी शार्दूल ठाकूरच्या समावेशाचे संकेत मिळत आहेत. भारतीय संघाने आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली होती; पण या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले. पहिल्या लढतीत वेगवान गोलंदाजीचे अनुकूल वातावरण असतानाही तो निष्प्रभ ठरला. दुसऱ्या वन-डेमध्ये प्रसिद्ध हा भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यामुळेच त्याला कर्णधार रोहित शर्माने पूर्ण १० षट्केही गोलंदाजी दिली नव्हती. प्रसिद्धने आठ षट्कांमध्ये ५३ धावांच्या मोबदल्यात अवघा एक विकेट मिळविला होता. त्यामुळे आता तिसऱ्या वन-डेमध्ये त्याला संघाबाहेर ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रसिद्धच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीपला संघात स्थान मिळू शकते किंवा मोहम्मद सिराजलाही यावेळी संधी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. रवींद्र जडेजाला गेल्या दोन्ही सामन्यात संधी देण्यात आली; पण तो अपयशी ठरला. दुसऱ्या सामन्यात जडेजाला एकही विकेट मिळविता आली नाही. फलंदाजीत अपेक्षा असतानाही जडेजाला चांगली कामगिरी करता आली नाही. जडेजा दुसऱ्या वन-डे सामन्यात २९ धावा करू शकला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. जडेजाच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in