टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पर्थमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पूर्वतयारी शिबिरात चेंडूची विलक्षण उसळी आणि गती यांचा वापर करून घेणे, समजून घेणे आणि वातावरणाशी जुळवून घेणे हे टीम इंडियाचे मूलभूत उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केले.
दक्षिण आफ्रिकेविरुध्दची मालिका २-१ अशी जिंकल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना द्रविड म्हणाले की, चेंडूची उसळी आणि गती जाणून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला लवकरात जाणे गरजेचे आहे.
भारतीय संघ आता टी-२० विश्वचषक २०२२ साठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळत भारत आपल्या मोहिमेही सुरुवात करणार आहे. यावर्षीचा टी-२० विश्वचषक भारत पटकावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
द्रविड पुढे म्हणाले की, पर्थमधील सरावात आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियातील परिस्थितीशी जुळवून घेणे हा लवकर रवाना होण्यामागचाचा उद्देश आहे. विशेषत: जे खेळाडू ऑस्ट्रेलियात याआधी सामने खेळले नाहीत, त्या खेळाडूंसाठी हे गरजेचे आहे.
द्रविड यांनी सांगितले की, आम्हाला पर्थमध्ये काही सराव सत्रे खेळण्याची संधी मिळेल आणि त्यानंतर काही सामने होतील. खेळपट्टीवरील चेंडूचा वेग आणि उसळी घेण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया खूपच विलक्षण आहे आणि आमच्या अनेक खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात जास्त टी-२० क्रिकेट खेळलेले नाहीत.
द्रविड पुढे म्हणाले की, ऑस्ट्रेलियाला लवकर जाण्याचा उद्देश संघाला सरावासाठी अधिकाधिक वेळ देणे हाच आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवरील चेंडूच्या वेगाची आणि उसळीची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागतो. सरावानंतर खेळाडूंना त्या परिस्थितीत कसे खेळायचे हे समजेल आणि त्यामुळे रणनीती आखणे सोपे होईल, अशी आशा आहे.
ऑस्ट्रेलियात लवकर जाणे महत्वाचे असल्याचे सांगण्यावर द्रविड यांनी खूपच भर दिला. ते पुढे म्हणाले की, भारतीय संघात अनेक युवा खेळाडू आहेत. त्यामुळे लवकर जाणे फायदेशीर ठरेल, अशी आशा वाटते.
द्रविड म्हणाले की, बुमराहला पर्याय शोधावा लागणार आहे. आपल्याकडे १५ ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहला वर्ल्डकपमधून वगळणे हा संघासाठी मोठा धक्का आहे.
सराव सामन्यांचे नियोजन
दरम्यान, भारतीय संघ गुरुवारी सकाळी संघ पर्थला रवाना होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सराव सामन्यांचेही नियोजन केले आहे. ब्रिस्बेनला जाण्यापूर्वी टीम इंडियातील खेळाडू पर्थमध्ये आपापसात काही सराव सामने खेळेल. २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारताच्या टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात होणार आहे.