यंदा भारतीय संघ उपांत्य फेरी गाठणार;विश्वविजेते प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना विश्वास

भारतीय संघातील १५ खेळाडू उत्तम असून प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव आहे.
यंदा भारतीय संघ उपांत्य फेरी गाठणार;विश्वविजेते प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना विश्वास

भारतीय संघ सर्व पातळींवर सक्षम असून ते यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी नक्कीच गाठतील, असा विश्वास माजी क्रिकेटपटू आणि झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केला. ६० वर्षीय लालचंद राजपूत यांच्या प्रशिक्षणाखालीच भारताने २००७मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला होता. रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनेच विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लालचंद राजपूत यांनी ‘नवशक्ति’शी केलेली खास बातचीत.

“भारतीय संघातील १५ खेळाडू उत्तम असून प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव आहे. विशेषत: फलंदाजीत भारतीय संघ धोकादायक वाटत असून मोहम्मद शमीच्या समावेशामुळे गोलंदाजीतही समतोल साधला गेला आहे. जसप्रीत बुमरा संघात नसणे महागात पडू शकते. मात्र प्रामुख्याने क्षेत्ररक्षणात भारताने चमकदार कामगिरी करणे गरजेचे आहे. भारतीय संघापुढील गटातील आव्हान पाहता ते उपांत्य फेरीपर्यंत नक्कीच मजल मारतील. त्यानंतर मात्र काहीही सांगता येणार नाही,” असे राजपूत म्हणाले.

भारतीय संघाच्या फलंदाजीविषयी विचारले असता राजपूत यांनी सूर्यकुमारवर खास लक्ष असेल, असे सांगितले. “सूर्यकुमारला मी जवळून ओळखतो. काही खेळाडूंना आयुष्यात उशिराने यश प्राप्त होते. परंतु ते कारकीर्दीच्या अखेरीस सर्वोच्च शिखरावर पोहोचतात. यंदाच्या विश्वचषकात सूर्यकुमार भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ असेल. त्याशिवाय विराट कोहली, रोहित शर्मा या अनुभवी खेळाडूंनी संयम बाळगून फलंदाजी केली, तर भारताला रोखणे कठीण जाईल,” असे राजपूत यांनी नमूद केले. तसेच भारतीय संघाने १५ जणांमध्ये पर्यायी खेळाडूंचीही अचूक निवड केली आहे, असे राजपूत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in