

बंगळुरू : अमन मोखाडेने (१२२ चेंडूंत १३८ धावा) साकारलेल्या शानदार शतकाच्या बळावर विदर्भाने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या कर्नाटकला ६ गडी व २२ चेंडू राखून धूळ चारली. याबरोबरच त्यांनी थाटात अंतिम फेरी गाठली.
प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने ४९.४ षटकांत सर्व बाद २८० धावा केल्या. देवदत्त पडिक्कल (४) यावेळी अपयशी ठरल्यावर करुण नायर (७६) व श्रीजिथ (५४) यांनी अर्धशतके झळकावली. वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडेने पाच बळी मिळवले. त्यानंतर अमनच्या १२ चौकार व २ षटकाराच्या बळावर विदर्भाने ४६.२ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. रवीकुमार समर्थ (७६) व ध्रुव शोरे (४७) यांनीही उपयुक्त योगदान दिले. आता त्यांच्यासमोर पंजाब किंवा सौराष्ट्रचे आव्हान असेल.
२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेच्या ३३व्या हंगामाला प्रारंभ झाला. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली होती. २०२४-२५च्या हंगामात कर्नाटकने अंतिम फेरीत विदर्भाला नमवून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.
बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे.
दरम्यान, मुंबईने क-गटातून दुसरे स्थान मिळवताना उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तसेच कर्नाटकविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्याकडे सर्फराझ खान विरुद्ध पडिक्कल असेही पाहिले जात होते. मात्र लढतीच्या दिवशी सकाळी सर्फराझला दुखापत झाल्याचे समजल्याने तो या लढतीस मुकला. तसेच तुषार देशपांडेही उपलब्ध नव्हता. अशा स्थितीत सिद्धेश लाडच्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ आधीच पिछाडीवर पडला. साखळी फेरीत रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल मुंबईकडून खेळले.