
बडोदा : रविचंद्रन स्मरणने (९२ चेंडूंत १०१ धावा) साकारलेल्या शतकाच्या बळावर कर्नाटकने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भावर ३६ धावांनी मात केली. याबरोबरच कर्नाटकने तब्बल पाचव्यांदा या स्पर्धेचे जेतेपद काबिज केले. तसेच सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या यादीत तमिळनाडूसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले.
कोटाम्बी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मयांक अगरवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कर्नाटकने ५० षटकांत ६ बाद ३४८ धावांचा डोंगर उभारला. क्रिशन श्रीजिथ (७८), अभिनव मनोहर (७९) यांनी अर्धशतके झळकावली. तसेय मयांक (३२), केवी अनीश (२१) यांनीही योगदान दिले.
त्यानंतर करुण नायरच्या नेतृत्वात खेळताना विदर्भाचा संघ ४८.२ षटकांत ३१२ धावांत गारद झाला. ध्रुव शोरेने ११० धावांची झुंजार शतकी खेळी साकारली. करुण यावेळी २७ धावांवर बाद झाला. मात्र हर्ष दुबेने ३० चेंडूंतच ६३ धावा फटकावून सामन्यात चुरस निर्माण केली होती. अखेरीस अभिलाष शेट्टीने ४९व्या षटकात त्याला बाद करून कर्नाटकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शतकवीर स्मरणला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कर्नाटकने पाच वर्षांनी ही स्पर्धा जिंकली. तसेच स्पर्धेत सर्वाधिक ७७९ धावा करणाऱ्या करुणला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. करुणने ९ सामन्यांत ५ शतके झळकावली.