विजय हजारे स्पर्धेत विराटचाही समावेश; दिल्ली क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांची माहिती

भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी स्वत: ही माहिती दिली. त्यामुळे चाहत्यांना देशांतर्गत स्पर्धेतही विराटला खेळताना पाहण्याची संधी मिळेल. २४ डिसेंबरपासून विजय हजारे स्पर्धा सुरू होणार आहे.
विजय हजारे स्पर्धेत विराटचाही समावेश; दिल्ली क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांची माहिती
विजय हजारे स्पर्धेत विराटचाही समावेश; दिल्ली क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांची माहिती(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी स्वत: ही माहिती दिली. त्यामुळे चाहत्यांना देशांतर्गत स्पर्धेतही विराटला खेळताना पाहण्याची संधी मिळेल. २४ डिसेंबरपासून विजय हजारे स्पर्धा सुरू होणार आहे.

रोहित शर्मा व विराट आता कसोटी व टी-२० प्रकारांतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे फक्त एकदिवसीय प्रकारांतच ते दोघे भारताकडून खेळताना दिसतात. रोहित व विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेद्वारे जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले. आता २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघातील स्थान टिकवण्यासह तंदुरुस्तीही कायम राखण्यासाठी दोघांना मेहनत घ्यावी लागणार आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात शानदार शतक झळकावले. तर विराटने अर्धशतक साकारले. तसेच सध्या सुरू असलेल्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही विराट छाप पाडत आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित विजय हजारे स्पर्धेत खेळणार असल्याचे समोर आले होते. आता विराटही या स्पर्धेत सहभागी होत आहे.

बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे.

अशा स्थितीत २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत रोहित-विराट सहभागी होऊ शकतात. २४ डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधीत मुंबईचा संघ ७ सामने खेळणार आहे. तसेच दिल्लीचेही या काळात सात सामने होतील. त्यामुळे रोहित मुंबईकडून व विराट दिल्लीकडून किमान ३ ते ४ लढती खेळेल, असे अपेक्षित आहे.

गतवर्षी, रोहित-विराट रणजी स्पर्धेत आपापल्या संघाकडून एक सामना खेळले. मात्र मे महिन्यात दोघांनीही कसोटीतून निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे देशांतर्गत स्पर्धेसह फक्त एकदिवसीय सामन्यात चाहत्यांना रोहित-विराटला खेळताना पाहण्याची संधी मिळू शकते. आता २०२७च्या विश्वचषकापर्यंत तंदुरुस्ती व फॉर्म टिकवण्यासाठी रोहित-विराट देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळताना दिसतील, असे सध्याच्या घडामोडींवरून समजते.

logo
marathi.freepressjournal.in