ट्वेन्टी-२० मालिकेत विराट कोहलीला सक्तीची विश्रांती

इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे.
 ट्वेन्टी-२० मालिकेत विराट कोहलीला सक्तीची विश्रांती
Published on

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून विराट कोहलीने स्वत:च न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या मालिकेसाठी ११ जुलै रोजी भारताचा संघ जाहीर होणार असून फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक प्रमुख खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. परंतु ट्वेन्टी-२० मालिकेत कोहली संघात परतेल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र कोहली स्वत:च ट्वेन्टी-२० मालिकेत खेळणार नाही, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. भारत-विंडीज यांच्यात २९ जुलैपासून त्रिनिदाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होईल. “ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ ११ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. अश्विनचे या मालिकेसाठी संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. कोहलीने या मालिकेतून विश्रांती घेण्याचे ठरवले आहे,” असे बीसीसीआयचा पदाधिकारी म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in