बंगळुरू : एकीकडे रोहित दुसऱ्या लढतीत अपयशी ठरलेला असताना बंगळुरू येथे विराटने मात्र बॅटचा धडाका कायम राखला. विराट (६१ चेंडूंत ७७ धावा) व ऋषभ पंत (७९ चेंडूंत ७० धावा) या दोघांनी साकारलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीने विजय हजारे स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.
ड-गटातील या लढतीत दिल्लीने गुजरातवर अवघ्या ७ धावांनी सरशी साधून गटात अग्रस्थान मिळवले. दिल्लीने केलेल्या २५४ धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ ४७.४ षटकांत २४७ धावांत गारद झाला. वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने ३ बळी मिळवले. आता दिल्लीची पुढील लढतीत सोमवारी सौराष्ट्रशी गाठ पडेल.
विराट तब्बल १५ वर्षांनी या स्पर्धेत सहभागी झाला आहे. रोहितप्रमाणेच त्यानेही पहिल्या लढतीत शतक साकारले होते. ११ जानेवारीपासून भारताची न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी तो या स्पर्धेत खेळून लय टिकवत आहे. पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे.
प्रथम फलंदाजी करताना विराटने १३ चौकार व १ षटकारासह अर्धशतक साकारले, तर पंतने ८ चौकार व २ षटकारांसह ७० धावा केल्या. हर्ष त्यागी (४०) व नितीश राणा (१२) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. मग गुजरातकडून आर्या देसाई (५७) व सौरव चौहान (४९) यांनी कडवी झुंज दिली. मात्र निर्णायक क्षणी ते बाद झाले व गुजरातला पराभव पत्करावा लागला. इशांत शर्मा व सिमरजीत सिंग यांनीही टिच्चून गोलंदाजी केली.