अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला सूर्यकुमार यादव या भारतीय फलंदाजांना ‘आयसीसी’च्या संघात स्थान लाभले आहे. रविवारी टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी संपल्यानंतर ‘आयसीसी’ने विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे संघ जाहीर केला.
यंदाच्या टी-२० विश्वचषकावर इंग्लंडने नाव कोरताना पाकिस्तानला पराभूत केले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरकडेच ‘आयसीसी’च्या संघाचे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. कोहलीने यंदा स्पर्धेदरम्यान सहा सामन्यांत सर्वाधिक २९६ धावा केल्या, तर मुंबईकर सूर्यकुमारनेही तितक्याच लढतींमध्ये तीन अर्धशतकांसह २३९ धावा फटकावल्या. एकूण सहा देशांतील खेळाडूंना या संघात स्थान लाभले असून यामध्ये इंग्लंडचे सर्वाधिक चार खेळाडू आहेत. भारत, पाकिस्तान संघांचे प्रत्येकी दोन, तर न्यूझीलंड, झिम्बाब्वे व दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला या संघात स्थान लाभले.
‘आयसीसी’चा संघ
जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, शादाब खान, सॅम करन, आनरिख नॉर्किए, शाहीन आफ्रिदी, मार्क वूड. १२वा खेळाडू : हार्दिक पंड्या.