
भारतीय क्रिकेट संघाला लागलेलं घटस्फोटाचं 'ग्रहण' काही संपण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या वर्षी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोटाचे वृत्त समोर आले. तर, काही दिवसांपासून फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा व त्यापाठोपाठ मनिष पांडे आणि अश्रिया शेट्टी विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यातच आता माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग देखील पत्नीपासून घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त आले आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत २० वर्षांच्या संसारानंतर वेगळे होत आहेत. कुटुंबातील जवळच्या सदस्याने सांगितल्यानुसार, दोघेही अनेक महिन्यांपासून वेगळे राहतायेत. २००४ मध्ये प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या जोडप्याला दोन मुले (आर्यवीर : जन्म - २००७ आणि वेदांत : जन्म - २०१० ) आहेत. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये सेहवागने सोशल मीडियावर आपल्या मुलांसह आणि आईसह फोटो शेअर केले होते. पण आरती कुठेही दिसली नव्हती किंवा पोस्टमध्ये तिचा उल्लेखही नव्हता. दोन आठवड्यांपूर्वी, सेहवागने पलक्कडमधील विश्व नागयाक्षी मंदिराला भेट दिली आणि तेथील फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. तथापि, या पोस्टमध्येही आरतीचा कोणताही संदर्भ नव्हता. त्यामुळे दोघेही विभक्त होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप वीरेंद्र सेहवागने मौन बाळगले आहे.