
मुंबई : गतवर्षी जूनच्या अखेरीस भारताने टी-२० विश्वचषक उंचावल्यावर ४ जुलै रोजी त्यांची मुंबईत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावरही तसेच अपेक्षित होते. मात्र १२ दिवसांच्या अवधीतच आयपीएल सुरू होणार असल्याने यंदा ‘व्हिक्टरी परेड’ म्हणजेच मिरवणूक होणार नाही, असे समजते. त्यामुळे असंख्य चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी टी-२० विश्वचषक विजेत्या खेळाडूंची जुलैमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी कोट्यवधी भारतीयांनी मरिन ड्राइव्ह येथे गर्दी करून विश्वविजेत्यांचे स्वागत केले. २००७ नंतर २०२४मध्ये अशी मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र आता २२ मार्चपासून आयपीएलचा १८वा हंगाम सुरू होणार आहे. एव्हाना प्रत्येक संघाचे त्यासाठी सराव शिबीर सुरू झाले आहे. वानखेडेवरसुद्धा मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिराला प्रारंभ झाला आहे. त्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळलेल्या भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळावी, कुटुंबीयांसह त्यांना वेळ घालवता यावा म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व खेळाडू भारतात परतल्यावर घरी थेट रवाना होतील. प्रशिक्षक गौतम गंभीरचे तर सोमवारी सायंकाळीच नवी दिल्ली येथे आगमनही झाले. सर्व खेळाडू १६ मार्चपर्यंत आपापल्या आयपीएल फ्रँचायझीसह सराव शिबिरात दाखल होतील, असे अपेक्षित आहे.
टीम इंडियाची जंगी मिरवणूक निघणार नसल्याने असंख्य चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.