आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शफाली, दीप्तीची दमदार कामगिरी; भारतीय महिलांची विजयी सलामी

शफाली वर्माच्या ६४ धावांच्या वादळी खेळीनंतर दीप्ती शर्माने एकही धाव न देता घेतलेल्या ३ बळींच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात थायलंडचा ९४ धावांनी दारुण पराभव केला.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शफाली, दीप्तीची दमदार कामगिरी; भारतीय महिलांची विजयी सलामी
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शफाली, दीप्तीची दमदार कामगिरी; भारतीय महिलांची विजयी सलामीX
Published on

दुबई : शफाली वर्माच्या ६४ धावांच्या वादळी खेळीनंतर दीप्ती शर्माने एकही धाव न देता घेतलेल्या ३ बळींच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात थायलंडचा ९४ धावांनी दारुण पराभव केला. भारतीय फलंदाजांच्या घसरगुंडीमुळे ७ वेळा विजेत्या ठरलेल्या भारतीय संघाला ९ बाद १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली. सुलीपॉर्न लाओमीने २६ धावांत ३ बळी घेत भारतीय मध्य फळीला हादरवले होते. मात्र, १५९ धावांचे लक्ष्य गाठताना थायलंडचा पूर्ण डाव १६.१ षटकांत ६५ धावांत आटोपला.

आपला १५०वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणाऱ्या २९ वर्षीय दीप्ती शर्माने ७ चेंडूंत एकही धाव न देता ३ बळी घेतले. या कामगिरीसह तिच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १७१ बळींची नोंद झाली असून ती महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी जगातील अव्वल गोलंदाज ठरली आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्यानंतर १५० टी-२० सामने खेळणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने १० षटकांत १०० धावांचा टप्पा पार केला होता. शेफाली वर्माने अवघ्या २६ चेंडूंत आपले १९ वे टी-२० अर्धशतक पूर्ण केले. तिने ३६ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ६४ धावा ठोकल्या. मात्र, लाओमीने शेफाली आणि रिचा घोष यांना सलग दोन चेंडूंवर बाद करत भारताला धक्के दिले. भारताने २१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी गमावले. शेवटी क्रांती गौडने ८ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्याने भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडता आला. थायलंडकडून नन्नापत कोंचारोएनकाय हिने ४१ धावांची लढाऊ खेळी केली, मात्र ती एकाकी ठरली. भारतीय गोलंदाजीत क्रांती गौडने २६ धावांत १, नंदनी शर्माने १८ धावांत ३ आणि श्री चरणीने १० धावांत २ बळी घेतले. भारताचा पुढील सामना गुरुवारी हाँगकाँगविरुद्ध होणार आहे.

या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, विद्यमान विजेता श्रीलंका, बांगलादेश, यजमान संयुक्त अरब अमिराती, थायलंड, हाँगकाँग आणि इंडोनेशिया हे संघ सहभागी होत आहेत. एकदिवसीय सामन्यांचा विश्वविजेता असलेला भारतीय संघ या स्पर्धेत प्रबळ दावेदार म्हणून उतरत आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in