१४ फेब्रुवारीपासून महिलांची आयपीएल; मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना

महिलांची आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) तिसऱ्या पर्वाला १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे.
१४ फेब्रुवारीपासून महिलांची आयपीएल; मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना
एक्स @wplt20
Published on

नवी दिल्ली : महिलांची आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) तिसऱ्या पर्वाला १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. १५ मार्चपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तसेच आयपीएलच्या गर्व्हनिंग कौन्सिलने शुक्रवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबईसह, बडोदा, बंगळुरू व लखनऊ येथे ही स्पर्धा आयोजित केली जाईल.

२०२३पासून आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या पर्वात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जेतेपद मिळवले. त्यावेळी पूर्णपणे मुंबईत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ब्रेबॉर्न, डी. वाय. पाटील आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर काही लढती झाल्या. त्यानंतर २०२४मध्ये बंगळुरू आणि पुणे येथे डब्ल्यूपीएल पार पडली. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ही स्पर्धा जिंकली. आता २०२५मध्ये चार शहरांत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.

बडोदा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये १४ तारखेला बंगळुरू आणि गुजरात यांच्यात सलामीची लढत होईल. बडोदा व लखनऊ येथे प्रथमच महिलांचे सामने होतील. मुंबई-बंगळुरू यांच्यात २१ फेब्रुवारीला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होईल. स्पर्धेच्या टप्प्यातील शेवटचे सामने सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होतील. तसेच एलिमिनेटर व अंतिम सामनाही मुंबईत होईल.

logo
marathi.freepressjournal.in