राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी स्पर्धेत भारताला क्रिकेटमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ धावांनी पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले.
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेवले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव १५२ धावांत संपुष्टात आला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तीन षट्कांतच संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या, त्यानंतर जेमिमा आणि हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ चेंडूत ९६ धावांची भागीदारी रचली. भारत विजयपथावर वाटचाल करीत असल्याने वाटत असतानाच जेमिमा ३३ धावांवर बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ६५ धावांवर बाद झाली. अखेरच्या षट्कात भारताला विजयासाठी ११ धावा करायच्या होत्या; पण त्या साकारण्यात अपयश आले.