
दीर्घ काळापासून भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती, अखेर गुरूवारी (दि.२०) अधिकृतरित्या दोघांचा घटस्फोट झाल्याचे वृत्त आले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांनी अधिकृतपणे विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
ABP न्यूजच्या वृत्तानुसार, गुरुवारी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात अंतिम सुनावणी आणि आवश्यक सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका वकिलाच्या म्हणण्यानुसार, दोघेही सकाळी ११:०० वाजल्यापासून न्यायालयात उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी दाम्पत्याला ४५ मिनिटांच्या समुपदेशन सत्राला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. त्यानंतर न्यायाधीशांनी विचारणा केल्यावर, चहल आणि धनश्री दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याची इच्छा असल्याचे स्पष्टपणे सांगितले. यावेळी गेल्या १८ महिन्यांपासून वेगळे राहत असल्याचेही त्यांनी कोर्टात सांगितले.
घटस्फोटाचं कारण काय?
विभक्त होण्यामागील कारण विचारले असता, त्यांनी, "एकमेकांशी जुळवून घेणं कठीण झालंय" (Compatibility Issues) हे मुख्य कारण म्हणून सांगितलं. त्यानंतर न्यायाधीशांनी अधिकृतरित्या घटस्फोट मंजूर केला आणि चहल आणि धनश्री यांचे पती-पत्नी म्हणून असलेले कायदेशीर बंधन आता समाप्त झाले असल्याचे जाहीर केले.
वांद्रे कौटुंबिक न्यायालयात संध्याकाळी ४:३० वाजता अंतिम निर्णय घोषित करण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, चहल आणि धनश्री दोघांनीही आपआपल्या सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या, पण दोघांनीही अद्याप घटस्फोटाचा स्पष्टपणे उल्लेख करीत कोणतेच सार्वजनिक भाष्य केलेले नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर मात्र घटस्फोटाच्या वृत्तावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.