उल्हासनगर : उल्हासनगरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी आज अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा डिस्ट्रिब्युशन योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने या योजनेचे उद्घाटन केले.
१९ जानेवारी शुक्रवारी उल्हासनगर -१ येथील गोल मैदान परिसराच्या आवारात ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन करण्यात आले. या योजने अंतर्गत उल्हासनगर महापालिकेला १२६ करोडचा निधी मिळाला असून, शहरात ज्या ठिकाणी पाइपलाईन नाही किंवा पाइपलाईन जुन्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी नवीन टाकणे, तसेच शहरातील ४ पाण्याच्या टाक्या या जुन्या झाल्या असून, त्या मोठ्या प्रमाणात लिकेज होत आहेत, त्यांची पुनर्बंधणी करणे अशा प्रकारची सर्व कामेही या योजनेंतर्गत करण्यात येणार आहेत. या सर्व कामांचा कालावधी हा २ वर्ष असून, पुढील २ वर्षात सर्व कामे ही पूर्ण करण्यात येतील अशी प्रतिक्रिया उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी दिली.
याप्रसंगी आयुक्त अजीज शेख, आमदार कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, अरुण आशान, जमनु पुरस्वानी, मीना आयलानी, चार्ली पारवानी, लखी नाथानी त्याचप्रमाणे उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, प्रियंका राजपूत, सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.