ठाणे : मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांना सुखरूप आपल्या गावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ठाणे विभाग दरवर्षीप्रमाणे यंदा जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातून १२६ एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले असून त्यामध्ये आरक्षणाच्या १०६ तर ग्रुप बुकिंगच्या एकूण २० गाड्यांचा समावेश आहे. येत्या रविवारी दि.२४ मार्चला होळी तर २५ तारखेला धुळवड साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणात होळीला जाणाऱ्यांची लगबग लक्षात घेता एसटीच्या ठाणे विभागाने चांगली कंबर कसली असून २२ मार्चला पहिल्या टप्प्यात बसेस सोडण्यात येणार आहे.
या आगारातून बसची सुविधा
ठाणे वंदना आगारातून २९, ठाणे खोपट आगारातून ३९, कल्याण आगारातून २३ आणि विठ्ठलवाडी आगारातून ३१ अशा एकूण १२२ बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच कल्याण आणि विठ्ठलवाडी आगारातून देखील कोकणच्या विविध भागात जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.