ग्रामीण भागातील १३ हजार ५३८ कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण; पंतप्रधान आवास, रमाई, शबरी, आदिम योजनांची यशस्वी अंमलबजावणी

स्वतःचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील १३ हजार ५३८ गोरगरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असून, केंद्र व राज्य सरकारच्या विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून या कुटुंबीयांना 'स्वप्नांचे घर' मिळाले आहे.
ग्रामीण भागातील १३ हजार ५३८ कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण; पंतप्रधान आवास, रमाई, शबरी, आदिम योजनांची  यशस्वी अंमलबजावणी

ठाणे : स्वतःचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील १३ हजार ५३८ गोरगरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असून, केंद्र व राज्य सरकारच्या विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून या कुटुंबीयांना 'स्वप्नांचे घर' मिळाले आहे. या योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाली असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.

गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास व राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, आदिम, मोदी घरकुल योजनाच्या माध्यमातून आदिवासी, अनुसूचित जाती-जमातीतील गोरगरीब, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिक, दुर्बल घटकांना पक्क्या घरासाठी अर्थसहाय्य दिले जाते. केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधून गेल्या पाच वर्षांत ठाणे ग्रामीण भागातील १३ हजार ५३८ गोरगरीब कुटुंबीयांना या योजनांतून घरकुल मिळाले आहे.

केंद्र पुरस्कृत घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत २०१६-१७ ते २०२१-२२ यावर्षात ९ हजार ५३५ घरकुल ठाणे जिल्ह्यात मंजूर झाली असून ८ हजार ९४६ घरकुल पूर्ण करण्यात यश मिळाले असून ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. शिल्लक ५८९ घरकुल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत करण्यात आले आहे. तर राज्य पुरस्कृत रमाई, शबरी व आदिम घरकुल योजनाच्या माध्यमातून २०१६-१७ ते २०२२-२३ साठी ९ हजार ६५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी ४ हजार ५९२ घरकुल बांधून पूर्ण झाली असून, उर्वरित घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.

"ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्याला मिळालेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेण्यास सुरुवात केली होती. कामाची स्थिती, कोणत्या अडचणी येतात, आवश्यक साहित्य किंवा कुशल कामगारांची स्थिती यावर भर दिला. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणा पोहोचली आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. गटविकास अधिकाऱ्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली."- छायादेवी शिसोदे, मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. ठाणे

logo
marathi.freepressjournal.in