
उल्हासनगर : भारत सरकारकडून प्रत्येक नागरिकाला देण्यात येणारे आधारकार्ड जळालेल्या अवस्थेत कचऱ्यात आढळल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर ४ मधील दहाचाळ सुभाष टेकडी परिसरात उघडकीस आली आहे. मैदानात कचरा जळत असताना काही नागरिकांना त्यात आधारकार्ड दिसून आले. त्यानंतर ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी लाख घातल्यावर तब्बल २५ ते ३० आधारकार्ड जळालेल्या अवस्थेत आढळले. विशेष म्हणजे ही कार्ड उल्हासनगरच्या भरतनगर व महात्मा फुले नगर परिसरातील नागरिकांची होती.
पोस्ट ऑफिस प्रशासनाचा गोंधळ आणि हलगर्जीपणामुळे नागरिकांचे अधिकृत कागदपत्रे धोक्यात येत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. ही कार्ड कोणत्या कारणाने फेकली गेली ? पोस्टमनच्या हलगर्जीपणामुळे की व्यवस्थापनाच्या अनास्थेमुळे ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याऐवजी पोस्ट ऑफिस व्यवस्थापक संदीप सैदाने यांनी "ही जुनी कार्ड आहेत" असे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
उल्हासनगरातील नागरिकांना बँकिंग, शासकीय योजना आणि ओळखपत्रांसाठी आवश्यक असलेले आधारकार्ड वेळेवर मिळत नाहीत. पोस्टमन ते घरी न पोहोचवता परत पाठवतात किंवा कचऱ्यात टाकतात, असा आरोप ॲड प्रशांत चंदनशिव यांनी केला आहे. यामुळे नागरिकांचे महत्त्वाचे व्यवहार खोळंबत आहेत आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडथळे येत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी ठाणे एसएसपीओ विभागाकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सध्या या गंभीर प्रकरणाची चौकशी होईल का? की प्रशासन नेहमीप्रमाणे डोळेझाक करेल, हा मोठा प्रश्न आहे. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर या गंभीर हलगर्जीपणाविरोधात मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
हे फक्त निष्काळजीपणाचे प्रकरण नाही, तर नागरिकांच्या हक्कांवर सर्रास अन्याय आहे! आधार कार्ड घरी पोहोचवण्याऐवजी कचऱ्यात जाळले जात असतील, तर हा भ्रष्टाचाराचा आणि बेफिकिरीचा कळस आहे. आम्ही या प्रकरणी ठाणे एसएसपीओ विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू!
- ॲड. प्रशांत चंदनशिव