अंबरनाथमध्ये २८ हजार लाभार्थींना मिळणार शंभर रुपयांत दिवाळी फराळ साहित्य

साखर, रवा, चणाडाळ प्रत्येकी एक किलो व पामतेल एक लिटर याचा समावेश असणार आहे.
अंबरनाथमध्ये २८ हजार लाभार्थींना मिळणार
 शंभर रुपयांत दिवाळी फराळ साहित्य
Published on

यंदा सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिका धारकांना राज्यशासनाकडून शिधावाटप दुकानांमार्फत १०० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. अंबरनाथमध्ये २८ हजार ३०० लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अंबरनाथ शहरात ६१ अधिकृत शिधावाटप दुकाने आहेत. केशरी आणि पिवळी शिधापत्रिका असणारे अंदाजे २८ हजार ३०० लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थींना दिवाळी उत्सव किट वितरित केले जाणार आहे. त्यामध्ये साखर, रवा, चणाडाळ प्रत्येकी एक किलो व पामतेल एक लिटर याचा समावेश असणार आहे. शासनाकडून किट्सचा पुरवठा होताच पुढील आठवड्यात दिवाळीपूर्वी लाभार्थींना दिवाळी किट्स वितरित करण्यात येईल अशी माहिती शिधावाटप नियंत्रण अधिकारी शशिकांत पाटसुले यांनी दिली.

दरम्यान, गुरुवारी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी शिधावाटप दुकानदारांची शिधावाटप अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शहरातील एक गोरगरीब नागरिक या किट पासून वंचित राहता कामा नये अशा सूचना उपस्थित दुकानदारांना दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in